केज तालुक्यातील पशुधन आणि शेळीपालकावर शेळीमर रोगाचे भिषण संकट.!

केज तालुक्यातील पशुधन आणि शेळीपालकावर शेळीमर रोगाचे भिषण संकट.!
साथरोगाची लागण झाल्याने अनेक शेळ्यासह पशुधन दगावले.!
पशुधन विभाग मात्र निद्राधीन, उपचाराअभावी पशुधन पडाताहेत मृत्युमुखी.
===================================
दत्तात्रय मुजमुले , केज प्रतिनिधी
गोरगरिबांच्या संसाराला आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने अनेकांनी शेळीपालन आणि गाय,म्हैस पालन केले आहे. परंतु केज तालुक्यात मर रोगाच्या आजाराने थैमान घातले असुन अनेकांच्या शेळ्या, गाय,बैल हे मर रोगाने मरु लागले आहेत. त्यामुळे पशुपालक व शेळीपालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. एवढी भिषण परिस्थिती असताना पशुधन आरोग्य विभाग मात्र गाढ झोपेत असल्याने आता करायचे काय ? असा प्रश्न पशुपालकावर समोर आ वासुन उभा राहिला आहे.
या बाबतची माहिती अशी की आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या गोरगरीबांनी आपल्या कुंटुबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेळीपालन व्यवसाय करत आहेत. जेणेकरून या व्यवसायातुन उत्पन्न मिळाले तर त्यावर आपल्या मुलामुलींचे विवाह करता येतील कोणाला घर बांधकामासाठी मदत होईल या उद्देशाने शेळीपालन व्यवसाय केला आहे. परंतु गेल्या पंधरा दिवसापासून केज तालुक्यातील बऱ्याच गावातील शेळ्या अचानक अज्ञात आजाराने मरू लागल्या आहेत. तर बऱ्याच ठिकाणी बैल ,गाय हे पशुधन देखील लाळ्या खुरकूत या सारख्या गंभीर आजाराने मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे पशुपालन आणि शेळीपालन करणाऱ्या पशुधन पालकांवर मोठे आर्थिक संकट आले असून दररोज जनावरे मरत आहे. आता करायचे काय ? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. केज तालुक्यातील बऱ्याच शेळीपालकांच्या शेळ्या मरु लागल्या असुन दै.लोकनायकचे पत्रकार महादेव काळे यांनी केलेल्या शेळीपालनातील ८ दिवसात ५ शेळ्या मेल्या असुन उर्वरीत ९ शेळ्या मधील आणखी ४ शेळ्या गंभीर आजारी आहेत.तर याशेळ्यावर उपचार करण्यासाठी उत्रेश्वर पिंप्री येथील पशुधनविकास अधिकारी श्री. डॉ. यादव यांनी उपचार केले परंतु त्या उपचाराला शेळ्यांनी प्रतिसाद न दिल्याने अखेर त्यांच्या ५ शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत तर या आजाराचे कारण काय ? व यावर नक्की उपचार कोणते हे पाहाण्यासाठी पशुधन विभाग झोपेतून जागा व्हायला हवा.
कारण या आजाराच्या लक्षणावरून अंदाजे उपचार केले जातात. परंतु या आजारी पशुवर खात्रीशीर उपचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावागावात लाळ्या खुरकुत व शेळ्यांच्या या आजारावर तात्काळ तपासणी व लसटोचणी शिबीरे घेणे गरजेचे आहे. जेणेकरून या रोगाला आळा बसुन या पशुपालकावरील मर रोगाचे संकट टळेल.