रखडलेल्या रस्त्यामुळे गतवर्षी ४५९ तर यावर्षी ५ महिन्यांत १५७ अपघातात बळी गेल्याची अंदाजे माहिती

बीड:- ( दि.२२ )
भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या आदेशानुसार २०२५-२६ च्या वार्षिक आराखड्यात बीड जिल्ह्यातील लातुर ते लोखंडी सावरगाव दरम्यान बर्दापुर फाटा ते लोखंडी सावरगाव १८ किलोमीटर रस्त्यावरील उर्वरित लांबीचे चौपदीकरण आणि माजलगाव ते केज दरम्यान धारूर जवळच्या ब्लॅक स्पॉट ठरलेल्या घाट या दोन टप्प्यांसाठी ४२१ कोटी रूपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
आम्हीच कामे केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांच्या कडुन मंजूर करून आणली म्हणत नितिनजी गडकरी यांचे आभार मानत माजी खासदार प्रितमताई मुंडे व विद्यमान खासदार बजरंग बप्पा सोनावणे यांची श्रेयवादासाठी दैनिकात पत्रकबाजी सुरू आहे. मात्र याचवेळी गेल्या वर्षी २०२४ मध्ये अपघातात ४५९ जणांनी आपला जीव गमावला तर ३९७ जण गंभीर जखमी झाले होते. तर जानेवारी २०२५ ते मे २०२५ या गेल्या ५ महिन्यात २५९ अपघातात १५७ जण मृत्युमुखी पडले असून व १०२ जण गंभीर जखमी झाल्याची शासन दरबारी नोंद आहे. निकृष्ट रस्ते, गुळगुळीत रस्त्यावरील गतिरोधकांचा अभाव, दिशादर्शक फलक नसणे आणि रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृतीच्या नावाखाली फोटो सेशन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे.जिल्ह्यातील महामार्गावर ४० ब्लँक स्पॉट आहेत.याबाबतीत मात्र केवळ सामाजिक कार्यकर्ते यांनीच वारंवार प्रशासन व सरकारला निवेदन,आंदोलनाद्वारे जागे करण्याचा प्रयत्न केला असुन आज श्रेयवादासाठी धडपडणारे लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प होते त्यामुळे या अपघातांची जबाबदारी सुद्धा त्यांनी घ्यायला हवी अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील महामार्गावर ४० ब्लँक स्पॉट —
एखाद्या ठिकाणी वारंवार होणारे अपघात लक्षात ठेवुन तेथील रस्त्याची स्थिती आणि अपघाताचे कारण शोधून उपाययोजना केल्या जातात.या जीवघेण्या अपघात प्रवण स्थळांना ” ब्लँक पोट ” म्हणून निश्चित केले जाते. बीड जिल्ह्यात महामार्गावर ४० ब्लँक स्पॉट” ठरविण्यात आली आहेत. ती पुढीलप्रमाणे सिरसाळा ,नित्रुड, नंदगाव डेअरी सायगाव ता.आंबेजोगाई )धारूर घाट, होळेश्वर विद्यालय, एचपी पेट्रोलपंप ते चंदनसावरगाव, सुडी पार्टी ते मांगवडगाव, लोखंडी सावरगाव, धामणगाव, वाघळूज, साबलखेड, पांढरी, पोखरी, चुंबळी फाटा, बामदळवाडी ,मांजरसुंबा घाट, मंझेरी रोड ,पाली , छत्रपती संभाजी महाराज चौक, पाडाशिंगी ब्रिज ,रांजणी ,गढी पूल ,वडगाव ढोक, नायरा पंप गेवराई, बागपिंपळगाव ,नागझरी सिरसदेवी शिवार, मादळमोही पेट्रोलपंप, सावरगाव, पांगर बावडी याठिकाणांचा समावेश आहे.निकृष्ट दर्जाच्या रस्ता प्रकरणी लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्पच :- डॉ.गणेश ढवळे —बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर गेल्यावर्षी जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान ४५९ जणांना अपघातात जीव गमवावा लागला असुन ३९७ जण गंभीर जखमी झाले आहेत तर यावर्षी जानेवारी २०२५ ते मे २०२५ दरम्यान २५९ अपघातात १५७ जण मृत्युमुखी पडले असुन १०२ जण गंभीर जखमी झाल्याची शासन दरबारी नोंद आहे. रस्त्यांची कामे ठरलेल्या कालावधीत पूर्ण न करता रखडलेले रस्ते, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उद्घाटनापुर्वीच रस्त्याला तडे जाणे, मोठमोठ्या भेगा पडणे ज्यात वाहनांचे चाक अडकुन अपघात होणे, अपघात प्रवण स्थळी गतिरोधकांचा अभाव, महामार्गावर अनेक ठिकाणी वळणावर सुचना व दिशादर्शक फलकांचा अभाव व सिग्नल यंत्रणा नसणे आदी असुविधांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले.
सामाजिक कार्यकर्ते यांनी यावेळी आवाज उठवला असताना लोकप्रतिनिधींनी मात्र याकडे दुर्लक्ष करत मुग गिळून गप्प बसल्याचे दिसून आले.यासंदर्भात आवाज उठवण्याचे टाळले.आत्ता मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपरीषद निवडणुकांच्या तोंडावर श्रेयवादाची पत्रकबाजी सुरू असल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे.