खा.रजनीताई अशोकराव पाटील यांचा मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा

बीड :- दत्तात्रय मुजमुले
मागील दोन महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासह काही प्रमुख मागण्यांसाठी श्री. मनोज जरांगे पाटील हे मौजे अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे उपोषण करत आहेत. सद्या ते दुसऱ्यांदा आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून मराठा समाजाची असलेली प्रमुख मागणी मराठा व कुणबी मराठा हे एकच असून महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण व कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे व यासाठी मनोज जरांगे पाटील मागणीला राज्यसभेच्या खासदार रजनीताई अशोकराव पाटील यांनी पुर्णपणे पाठिंबा दिल्याचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे.
पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की,आपण नेमलेल्या न्या. शिंदे समितीला मोठया प्रमाणावर पुरावे समाजाने सादर केले आहेत. व मराठा समाज हा बहुतांशी शेतकरी आहे. मात्र शेती पुर्णपणे निसर्गावर अवलंबून झाल्याने दरवर्षी कोणत्या न कोणत्या कारणाने शेती नापीक होत आहे. मराठा समाजातील मुल, मुली आज उच्च शिक्षीत होऊनही त्यांना केवळ आरक्षण नसल्याने याचा लाभ मिळत नाही. तरी आपण मराठा समाजाच्या मागणीचा विचार करता महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने केलेली मागणी लवकरात लवकर मार्गी लावावी. श्री. मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत दररोज खालावत चालली असून याची गांभीर्याने दखल घ्यावी. व मराठा समाजाला आरक्षण तात्काळ जाहीर करावे. जेणे करुन आजपर्यंतच्या आंदोलनास न्याय मिळेल अशी मागणी खासदार रजनीताई अशोकराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.