मौजे भालगाव येथील ग्रामस्थांचे मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला सुरूवात

केज :- दत्तात्रय मुजमुले
मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठींबा म्हणून भालगाव (ता. केज) येथील ग्रामस्थांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करीत शुक्रवार दि.२७ रोजी गावात साखळी उपोषण सुरू करत ग्रामस्थांनी ग्रामपंचयत निवडणुकीसह आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालत व नेत्यांसह कार्यकत्यांना गाव बंदी करून साखळी उपोषण सुरु केले आहे.
सरकारने मनोज जरांगे पाटील यांना ३० दिवसांत मराठा आरक्षण मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर ही जरांगे पाटील यांनी सरकारला ३० दिवसाऐवजी आणखी १० दिवसाची मुदत वाढवून दिली होती. ही मुदत २४ ऑक्टोबर रोजी संपल्याने मराठा समाजबांधवांना कायद्याच्या कसोटीवर टिकणारे व स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठींबा म्हणून भालगाव (ता. केज) ग्रामस्थांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करत २७ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावात साखळी उपोषणास सुरुवात केली.उपोषणास नायगाव, आणेगाव, सादोळा,पाथरा येथील ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला.
उपोषणास सरपंच युवराज ढोबळे,बाळासाहेब हांडीबाग, बालासाहेब मोरे,मयूर सुरवसे यांच्यासह ग्रामस्थ बसले आहेत. भालगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीसह आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालत सर्वच पक्षाच्या नेत्यांसह कार्यकत्यांना प्रवेशबंदी केली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शुक्रवारपासून गावात साखळी उपोषण सुरू केले आहे.