पोलीस प्रशासन हे दबावाखाली काम करीत असल्याचा पप्पू कागदे यांचा आरोप

केज:- प्रतिनिधी
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी हे जो पर्यंत अटक होत नाहीत आणि त्यांना कठोर शासन होत नाही. तो पर्यंत रिपाइं देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तसेच या हत्याकांडा तपास करणारी यंत्रणा ही कुणाच्यातरी दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केला. या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्यात यावा. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मागणी केली असल्याचे सांगितले.
या बाबतची माहिती अशी की, दिनांक १६ डिसेंबर रोजी युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे हे केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेवून त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्या सोबत रिपाइंचे जिल्हा सचिव राजू जोगदंड, तालुका अध्यक्ष दिपक कांबळे, माजलगावचे तालुकाध्यक्ष अविनाश जावळे, मराठवाडा संघटक गोवर्धन वाघमारे, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, जिल्हा सल्लागार उत्तम मस्के, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सरवदे, युवा रिपाइंचे निलेश ढोबळे, ईश्वर सोनवणे, राजेश सोनवणे, जेष्ठ नेते दिलीप बनसोडे, नाना गायकवाड, सूरज काळे, विनोद गायकवाड, रोहित बचुटे, रंजित कांबळे, राहुल वाघमारे, सन्नी प्रधान, यांच्यासह रिपाइंचे नेते उपस्थित होते.यावेळी पप्पू कागदे म्हणाले की, संतोष देशमुख यांचे हत्याकांड हे मानवतेला काळीमा फासणारे अत्यंत अमानवीय आणि निर्दयीपणाची परिसीमा ओलांडणारी निंदनीय घटना आहे. त्यामुळे आम्ही रिपाइंचे कार्यकर्ते ना. रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. जो पर्यंत या हल्लेखोरांना अटक होत नाही आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही; तो पर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तसेच येथील तपास यंत्रणा ही कोणाच्यातरी दबावाखाली काम करीत असल्याने अद्यापही फरार आरोपींना अटक करण्यात ते अपयशी ठरले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या हत्याकांडाचा तपास हा एखाद्या कर्तव्य कठोर आयपीएस अधिकाऱ्यांच्या एसआयटी मार्फत करण्यात यावा.
या मागणी करीता दोन दिवसा पूर्वीच त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवस्थानी भेटून निवेदनाद्वारे मागणी केली आहे.