राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) :-
अंबाजोगाई तालुक्यावर दुष्काळाचे सावट पडले असून, शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे दुष्काळासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजना तात्काळ सुरू करा, शेतकऱ्यांसह शेतमजूर, बांधकाम मजूर, विद्यार्थी या घटकांना तात्काळ न्याय द्या याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मार्च २०२४ पासून विषय लावून धरला. बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली. त्यानंतर सरकारने दुष्काळ ही जाहीर केला. तरी परंतु, आजपावेतो प्रभावी उपाययोजना लागू केलेल्या नाहीत. तरी तात्काळ केज मतदारसंघात दुष्काळी उपाययोजना लागू करा अशी मागणी माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी केली आहे.
याबाबत उपजिल्हाधिकारी यांना शुक्रवार, दिनांक १४ जुन रोजी निवेदन दिले आहे.यापूर्वी दुष्काळाच्या उपाययोजना करा यासह एकूण १२ मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी ५ मार्च २०२४ रोजी तुतारी वाजवून अनोखे आंदोलन केले होते. त्यानंतर ही एक निवेदन दिले. याच मागण्यांसाठी हे तिसरे निवेदन दिलं आहे. वारंवार निवेदन देऊन ही शासन व प्रशासन यांनी त्याची साधी दखल ही घेत नाही. याबाबत निवेदकांनी शासन व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाने आक्रमक पवित्रा घेत केज विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई व केज तालुक्यात दुष्काळाच्या उपाययोजना तात्काळ सुरू करण्यात याव्यात म्हणून शुक्रवारी निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात सध्या दुष्काळाचे सावट पडले असून, शेतकरी हवालदील झालेला आहे. त्यामुळे दुष्काळासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजना तात्काळ सुरू करण्यात याव्यात व शेतकऱ्यांच्या पुढील मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात असे नमूद केले आहे. मागण्या अशा आहेत – ज्या शेतकऱ्यांना २५ अनुदान अग्रीम मिळालेले आहे, त्या शेतकऱ्यांचे उर्वरीत ७५ अनुदान तात्काळ खात्यात जमा करण्यात यावे व ज्या शेतकऱ्यांना अनुदान अग्रीम मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांचे पुर्ण अनुदान तात्काळ खात्यात जमा करण्यात यावे., सक्तीचे कर्ज वसुली थांबवुन गोठविलेले खाते पुर्ववत चालू करण्यात यावेत., शासनाने जाहिर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यात अंबाजोगाई व केज तालुक्याचा समावेश असल्यामुळे दुष्काळी अनुदान तात्काळ खात्यात जमा करण्यात यावे., शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज बील माफ करण्यात यावे. विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. या सर्व मागण्यांचा विचार करून दुष्काळाबाबत उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सदरील निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे अंबाजोगाई व केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्विराज साठे व तालुकाध्यक्ष अमर दगडूसाहेब देशमुख यांच्यासह ऍड.शहाजहान खान पठाण, ऍड.नरेश साबणे, ऍड.बी.एस.निंबाळकर, तानबा लांडगे, व्यंकटेश चामनर, यशोधन लोमटे, सिध्दु लोमटे, सुधाकर जोगदंड, नामदेव गडदे, जुम्मा चौधरी, प्रशांत पवार, देविदास देवकते, फैजान मिर्झा, रविंद्र मोरे, धनराज सोनवणे, अकबर अली, भगवान ढगे, ज्योतिराम कुरणे, राहुल सिरसट, गणेश घाडगे, सागर माने, दिलीप पवार आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दुष्काळी उपाययोजना सुरू करा :बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई तालुक्यात यावर्षी सर्वदूर दुष्काळाचे सावट पडले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रश्नी संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांचे कर्ज माफ करण्यात यावे, शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा, गाईचे व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर भाव वाढवून देण्यात यावा, दुष्काळाचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. दुष्काळी उपाययोजना तातडीने सुरू करा*- पृथ्विराज साठे*(माजी आमदार, केज विधानसभा मतदारसंघ.)
दुष्काळ जाहीर पण, अद्याप ही कारवाई झालेली नाही : -गतवर्षी कमी पावसामुळे शेतमालाचे उत्पन्न घटले आहे. रबी हंगामात ही उतार कमी आला. शेतीला पाणी नाही. विहिरींनी तळ गाठला आहे. गुरांना चारा नाही, शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगार युवक हे सर्व समाज घटक त्रस्त आहेत. याविषयी आम्ही वेळोवेळी निवेदने दिली. त्यानंतर दुष्काळ जाहीर झाला. पण, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. तरी दुष्काळी परिस्थिती पहाता यावेळी संपूर्ण बीड जिल्ह्यात तीव्र दुष्काळामुळे उपाययोजना लागू करा.
– अमर देशमुख(तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार.)