अखेर चौथ्या दिवशी थकीत मानधनासाठी सुरू असलेले साक्षर भारतच्या प्रेरकांचे आमरण उपोषण सुटले..!

केज :- दत्तात्रय मूजमुले
सन २०१२ ते मार्च २०१८ या कालावधीत राबवलेल्या साक्षर भारत योजना कालावधीत काम केलेल्या प्रेरक व समन्वयक यांनी आपल्या विविध मागण्यासाठी मंगळवारपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते.चौथ्या दिवशी मात्र एका उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली आणि प्रशासनाला जाग आली व उपोषणस्थळी भेट देत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याच्या आश्वासनावर प्रेरकांचे उपोषण सोडण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, साक्षर भारत योजना ही २०१२ ते मार्च २०१८ या कालावधीत राबवण्यात आली कालावधीत प्रत्येक गावातील निरक्षरांना साक्षर करण्याचे काम अत्यंत कमी मानधनावर प्रेरकांनी केले. २०१२ ते सप्टेंबर २०१५ पर्यंत व फेब्रुवारी २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत मानधन वेळेवर देण्यात आलेले नसतानाही प्रेरकांनी त्यांची कामे केलेली आहेत .शासन भविष्यात कायमस्वरूपी सामावून घेतील या आशेने आपले काम केले . मानधन मिळण्यासाठी व नवीन योजनेत सामावून घेण्यासाठी आजवर संघटनांनी अनेक मोर्चे,आंदोलने केली. संचालक कार्यालय , जिल्हा कार्यालयात निवेदनही सादर केली . परंतु शासनाने मोर्चे आंदोलने व निवेदनाकडे दुर्लक्ष केले.निरक्षरांना साक्षर करण्याचे काम करून घेऊन योजना बंद केली आणि प्रेरकाना वाऱ्यावर सोडून दिले. प्रौढ साक्षरतेशी संलग्नित पढना , लिखना योजनेतही आदेश दिले नाहीत शासनाच्या या आमच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेध म्हणून व समन्वयक , प्रेरकांना नवभारत साक्षरता कार्यक्रमात सामावून घेऊन रोजगाराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी 2 ऑक्टोबर पासून जिल्हा समन्वयक व प्रेरकानी उपोषण सुरु केले होते,अखेर हे उपोषण चौथ्या दिवशी सोडण्यात आले.
गावखेड्यातील प्रौढ निरक्षरांना साक्षर करण्यासाठी साक्षरता मोहीम राबवण्यात आली होती . अनेक तरुणांनी नाम मात्र मानधनावर साक्षरता मोहीम यशस्वी पणे राबवली . कमी मानधन आणि तेही वेळेवर मिळत नव्हते . परंतु ज्ञान दानाच्या पवित्र कार्यात प्रेरक , समन्वयक यांनी प्रामाणिकपणे धुरा सांभाळली.या सेवेच्या मोबदल्यात कायम संधी मिळेल अशी आशा होती .मात्र कायम स्वरूपी सेवा करण्याची व थकीत मानधनही मिळाले नाही . दुर्दैवाने लाल फितीत अडकलेल्या कारभारामुळे प्रेरकांच्या कार्याकडे दुर्लक्ष झाले . त्यामुळे प्रेरकांवर आंदोलन करण्याची वेळ आली होती. साक्षरतेसाठी झटणाऱ्या वर्गाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने सरकारविरुद्ध तीव्र नाराजी आहे .
चौकट :- शिक्षण मोहिमेत काम करण्याच्या प्रेरकांच्या मागण्या सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन सोडवाव्यात असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले असून , तसे पत्र शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पाठवले आहे . आंदोलनस्थळी भाजपचे जिल्हाध्यक्ष मस्के यांनी भेट देऊन प्रेरक -समन्वयक यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
चौकट :- हक्काच्या थकीत मानधनासाठी उपोषणास बसलो आहोत.मात्र आमच्या आंदोलनाकडे कोणत्याही अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलेले नाहीये.आज उपोषण सोडले असेल तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष चालूच राहील :- फिरोज पठाण ( उपोषणकर्ते)
चौकट :- उपोषणादरम्यान एका आंदोलन कर्त्याची प्रकृती बिघडली होती.मात्र आम्ही उपोषणावर ठाम होतो.उपोषण सुटले मात्र न्याय व हक्काचा लढा कायम राहील. ही तर उद्रेकाची सुरवात आहे हे शासनाने आणि प्रशासनाने लक्षात घ्यावे :- गणेश काळे ( उपोषणकर्ते)