एकाच अधिवेशनात जिल्ह्याच्या अनेक विषयांना गती

बीड: प्रतिनिधी
दि.२५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत संसदेचे १८ वे (शीतकालीन) अधिवेशन नवी दिल्ली येथे संपन्न झाले. या अधिवेशनात खा.बजरंग सोनवणे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्यांकाड प्रकरणात सर्वप्रथम आवाज उठविला. याच बरोबर जिल्ह्यातील २० महत्वपूर्ण मुद्द्यावर संसदेत आवाज उठविला.
यात, रेल्वे, संपादित जमीनी, रोजगार, आरोग्य आदि विषय मांडण्यात आले. एकूणच एकाच अधिवेशनात अनेक विषयांना गती देऊन विकासाचा नवा इतिहास लिहिण्याचा प्रयत्नच यातून दिसत आहे.खा.बजरंग सोनवणे यांनी ग्रामपंचायतीपासून कामकाजाला सुरूवात केलेली आहे. यामुळे ग्राऊंडवरील प्रश्नांची जाण ठेवून संसदेच्या अधिवेशनात जवळपास वीस विषयांना हात घातला. दि.९ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर एक तासात मिडीयासमोर येऊन ही हत्या पवनचक्की खंडणी वसुली प्रकरणातून झाली आहे हे त्यांनी ठासून सांगितले. ११ डिसेंबर रोजी याच प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली तर १६ डिसेंबर रोजी संसदेत आणि संसदेबाहेरही खा. प्रियंका गांधी, खा. सुप्रिया सुळे व महाविकास आघाडीतील सर्व सहयोगी खासदारांसोबत आवाज उठविला. यामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला. परिणामी, गुन्हे दाखल झाले आणि तपासाला गती मिळाली. याच बरोबर आहिल्यानगर- बीड- परळी रेल्वे १५ ऑगस्ट २५ पूर्वी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.
घाटनांदूर येथे रेल्वे थांबा, जिल्ह्यातील रेल्वेसाठी संपादित जमिनीचा मावेजा वाटप, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, रासायणिक औषधे व खतांचा अतिरेकी वापरामुळे शेती व मानवी प्रकृतीवर होत असलेले दुष्परिणाम, पोल्ट्री व्यवसाय नियमात सुधारणा करणे, राष्ट्रीय खेळाडु युवतीना शासकीय सेवेत सामाऊन घेणे, तरुणांना रोजगारसंधी उपलब्ध करुन देण्यासाठी तातडीने कृती करणे, मराठा व कुणबी एकच आहेत. याबाबतचे सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन केंद्रीय मागासवर्गीय आयोगास निर्देश देणेसाठी पाठपुरावा, वक्फ बोर्ड नियम १९९५ मधे सुधारणा करण्याचे विधेयकावर पुनर्विचार करावा अशी मागणी गठित समितीसमोर केली, संसदीय समितीच्या समितीमधे प्रभावी काम करणे तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीमधे पोलीस तपासामधे आधुनिक साधनांचा वापराचे महत्व, जिजाऊ मल्टीस्टेटमधील ठेवीदारांना न्याय देणे, पवनचक्की व सौरउर्जा प्रकल्पासाठी कंपन्यांकडून शेतकऱ्यांचे होत असलेले शोषण व दडपशाही थांबविणे, बीड येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व दवाखाना उभारणीस मंजुरी देणे, जिल्ह्यामधे नवीन उद्योग उभारणीसाठी कंपण्यांना प्रोत्साहित करणेसाठी सुविधा निर्माण करणे, सर्वच तालुका मुख्यालयास तालुकास्तरावर मिनी क्रीडा संकुल उभा करणे, राष्ट्रीय महामार्ग कामांना गती देणे, राक्षसभुवन फाटा ते शेवगाव व पिठ्ठी ते टाकळी काझी या जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जावाढ करुन राष्ट्रीय महामार्ग दर्जा देणे, सूरत- चेन्नई प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन कामास गती देणे, माजलगाव ते केज या महामार्गावरील धारुर घाटामधे प्रवाशांची होत असलेली असुविधा दूर करणे, अशा जवळपास २० विषयावर त्यांनी प्रभावीपणे विषय मांडले.
यामुळे जिल्ह्यातील या विषयांना गती मिळताना दिसत आहे. एकूणच यापुर्वी संसदेत असे विषय मांडताना कोणीही दिसले नव्हते, यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाचा नवा इतिहासच लिहिण्यासाठी खासदार सोनवणे प्रयत्न करत असल्याचे दिसते.