आणखी दोन खून;जिल्ह्यात दहशदीचे वातावरण

बीड प्रतिनिधी
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात गुन्हेगारी झपाट्यानं वाढल्याचं समोर आलं असतानाच आत पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा गावातील दोन सख्खा भावांची हत्या करण्यात आली आहे. तर तिसरा भाऊ जखमी झाला आहे.
अजय विलास भोसले,भरत विलास भोसले अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत. तर कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी आंभोरा पोलिसांनी सात संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका डिप्परने दुचाकीवर असलेले सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांनी धडक दिली. यात अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. अशातच या हत्येच्या घटनेमुळे बीडमध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल गुरूवारी वाहिरा येथे रात्री दहा वाजताच्या सुमारास हल्लेखोरांनी तीन सख्ख्या भावांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन भावांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही गंभीर घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली.आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते.गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते.रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.
या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नाही.दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.