राजकीय
बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिष्टमंडळ कृषी मंत्र्याच्या भेटीला

बीड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर व विविध विकास कामांसाठी बीड जिल्ह्यातील शिष्टमंडळाने कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन कृषी मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्या बद्दल त्यांचा सत्कार करुन त्यांच्याशी बीड जिल्ह्य़ातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. या वेळी येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग बाप्पा सोनवणें, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बाप्पा शिंदे,जेष्ठ नेते बबनराव गवते बापु आदी मान्यवर उपस्थित होते.
दि. १८ जुलै रोजी बीड जिल्ह्य़ातील शिष्टमंडळाने मुंबई येथे मंत्रालयात कृषीमंत्री ना. धनंजय मुंडे यांची भेट घेऊन बीड जिल्ह्य़ातील बीड व केज विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी व जिल्ह्य़ातील कमी पाऊसा मुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच मागील वर्षीचा पिक विमा अद्याप पर्यंत मिळालेला नाही गेल्या वर्षीचे अतिवृष्टी अनुदाना पासून शेतकरी वंचित आहेत. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्य़ातील शेतकर्यांना मिळावा तसेच विविध विकास कामांना गती देण्यासाठी व रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी व विजेच्या प्रश्नांवर, विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा विषयी ना. धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या व सर्व सामान्य जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या दैनंदिन कामासाठी बीड शहरात मंत्री महोदयांनी स्विय सहायकाची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातून भेटीला आलेल्या शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर ना. धनंजय मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगितले आहे.
~ बजरंग सोनवणे