जागतिक मतदार दिनाच्या औचित्याने बीड मध्ये काँग्रेसची पत्रकार परिषद

बीड : प्रतिनिधी
जागतिक मतदार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राज्यभरात आंदोलन करत आक्रमक झाली असुन याच अनुषंगाने आज काँग्रेसचे माजी मंत्री अशोकराव पाटील यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ थोटे, बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री अशोकराव पाटील म्हणाले की, निवडणूक आयोग ही संवैधनिक व स्वायत्त संस्था असुन राज्यघटनेने निवडणूक आयोगाला दिलेले अधिकार आबादित राखून निवडणुका पारदर्शक होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील वाढलेली मतांची टक्केवारी संशयास्पद असुन दुपारी पाच नंतर 76 लाख मते वाढली कशी? हा महाराष्ट्रातील जनतेला पडलेला प्रश्न असुन याचे उत्तर अद्याप निवडणूक आयोगाने दिलेले नाही. निवडणूकितील पक्षपात थांबवुन निवडणुका पारदर्शक व्हाव्यात. निवडणूक आयोग भाजपच्या हिताचे काम करत असुन ते लोकशाहीला घातक आहे. निवडणूक आयोगाने निःपक्ष निवडणुका घेवुन जनतेची विश्वासार्हता जोपासावी असेही ते म्हणाले.
यावेळी प्रविणकुमार शेप, डॉ. दिलीप मोटे, गणेश राऊत, संभाजी जाधव, ऍड. प्रकाश मुंडे, विष्णु मस्के, शेख मोहसीन, गणेश जवकर, शेख फरहान,शामसुंदर जाधव, जयप्रकाश आघाव, भैया गोरे, बळीराम गिरम आदी पदाधिकारी उपस्थित होते.