राजकीय स्वार्थ सोडून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा:- डॉ. खोडसे

केज :- दत्तात्रय मुजमुले
सध्या पाऊसाने दांडी मारल्यामुळे अतिशय भयंकर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हवालदील आणि संकटात सापडला आहे.मात्र राजकारणी आणि सरकार कोट्यावधी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली,अशी स्वतःची पाठ थोपटून राजकीय पोळी भाजत आहेत.इकडे पावसा अभावी पिकाची राख रांगोळी होत आहे आणि तिकडे राजकारणी मात्र शक्ती प्रदर्शन करण्यात व्यस्त आहेत.अर्ध्या पेक्षा जास्त पावसाळा संपत आला तरी पासून पडलेला नसून जेमतेम पावसावर तग धरून असलेली पिके आता माना टाकायला लागली आहेत. तर हलक्या जमिनीतील पिके करपायला लागली आहेत.
सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसायचे काम चालू आहे.आता सर्वच पिकांची माना टाकल्याने शेतकरी वर्ग प्रचंड मानसिक दडपणाखाली असून चिंताग्रस्त झालेला आहे. आता पेरणीसाठी केलेला सर्व खर्च वाया गेलेला आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे आणि शेतकरी अडचणीत आल्याने मजूर वर्ग देखील संकटात आहे. त्यामुळे राजकीय स्वार्थ सोडून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी योग्य आणि ठोस पाऊले उचलावीत अशी मागणी शिवसंग्रामचे नेते डॉ उत्तम खोडसे यांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्री महोदयांकडे करणार असल्याचे शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले आहे.