Uncategorized

शेतकरी, ऊसतोड मजूर, कामगारांचे पैसे वेळेवर देणे हीच आमची औकात- बजरंग सोनवणे

शेतकरी, ऊसतोड मजूर, कामगारांचे पैसे वेळेवर देणे हीच आमची औकात

बजरंग सोनवणेंची औकात, लायकी काढणाऱ्यांना चपराक 

बीड / परळी

ज्यांना आपल्या वडिलांनी उभा केलेले साखर कारखाने नीट चालविता आले नाहीत. कारखान्यातील कामगार व शेतकऱ्यांचे पैसे बुडविले, त्यांची लायकी काय ? त्यांनी आमची औकात व लायकी काढणे म्हणजे ही चेष्टा असून आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर दिले. ऊसतोड कामगार व कारखान्यातील कामगारांचे कामाचे पैसे वेळेवर देणे हीच आमची औकात आहे अशी चपराक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्री आणि भाजप उमेदवारांना लगावली.

    बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे हे शुक्रवारी परळी तालुक्यात प्रचार दौऱ्यावर होते. त्यांनी पौळ पिंपरी येथे बोलताना पालकमंत्री व भाजपा उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ गित्ते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ॲड. अजय बुरांडे, सुदामतीताई गुट्टे, ॲड. माधव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

     पुढे बोलताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की, एक सामान्य शेतकरी कुटुंबातील शेतकरी पुत्र असून सुद्धा मी दोन – दोन साखर कारखाने यशस्वीपणे चालवित आहे. मराठवाड्यात उसाला विक्रमी भाव देत आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व ऊसतोड मजूरांचे पैसे आम्ही बुडवीले नसून आमच्या समर्थकांना जर कोणी धमकावीत असेल तर त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहोत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसून माझे दोन्ही कारखाने दुप्पट क्षमतेने चालू आहेत. माझा जन्म कोणत्याही राजकारणाच्या पोटी झालेला नसताना सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलो. माझे आई-वडील शेतकरी असले तरी मला राजकीय जन्म देणारे सामान्य नागरिक हे माझे राजकीय मायबाप आहेत. असे भावनिक उदगार काढून त्यांनी मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये जर भाजपने मतदारसंघाचा विकास केला असता तर मग त्यांना मतांची भीक मागण्याची आवश्यकता पडली नसती. असे सांगून जे आज मला विरोध करीत आहेत, त्यांचाही ऊस मीच गाळप केला. त्यामुळे उसासाठी कोणीही घाबरण्याचे कारण नाही. असे म्हणत त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ही दिला. 

    त्यांनी परळी तालुक्यातील गोवर्धन (हिवरा), हिवरा (गोवर्धन), रामनगर तांडा, जळगव्हाण, रामेवाडी (कासारवाडी), पोहनेर, दिग्रस, बोरखेड, तेलसमुख या गावांना भेटी दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


वैद्यनाथ कारखाना बंद असल्याचे दुःख – फुलचंद कराड


भाजपच्या उमेदवार या स्वतःला विकास कन्या म्हणून घेत आहेत. जर त्यांनी पालकमंत्री असताना मतदारसंघाचा विकास केला असता तर त्या निवडणुकीत पराभूत झाल्याच नसत्या. वैजनाथ साखर कारखाना बुडविण्यासाठीच या दोघा बहिण – भावांनी जागा वाटून घेतल्या. याचे वाईट वाटत नसून स्व. गोपीनाथ मुंडे यांनी रक्ताचे पाणी करून त्याची उभारणी केली. तो कारखाना बंद असल्याने त्याचे मनस्वी दुःख होते. त्यामुळे या दोन्ही बहिण भावांना आता मतदाराने घरी बसण्याची वेळ आलेली आहे. असे फुलचंद कराड म्हणाले.


पौळ पिंपरीत जंगी स्वागत, रामेवाडीत बैलगाडीतून मिरवणूक 


पौळ पिंपरी येथे गावकऱ्यांनी ढोल ताशा वाजवून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या तुताऱ्या वाजवून बजरंग सोनवणे यांचे जंगी स्वागत केले. तर रामेवाडी (कासारवाडी) येथे सजविलेल्या बैलगाडीतून बजरंग बप्पा सोनवणे, बाबनभाऊ गित्ते, फुलचंद कराड आणि राजेसाहेब देशमुख यांची ढोल, ताशा आणि तुताऱ्या वाजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!