केज येथे रिपाइं (ए)चे तीव्र निदर्शने

केज :- प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी आणि केज तालुक्यातील येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी केजल ज तालुका रिपाइं (ए) च्या वतीने तहसील कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आले.या बाबतची माहिती अशी की, परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ भीम अनुयायी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. त्याचे व्हिडिओ चित्रण हा सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी करीत असताना पोलिसांनी त्याला अमानुष मारहाण केली. त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू हा न्यायालयीन कोठडीत झाला. त्यांचा शवविच्छेदन अहवाल देखील प्राप्त झालेला आहे. अहवालात त्यांचा मृत्यू हा मारहाणीमुळे गंभीर जखमा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा स्पष्ट अहवाल प्राप्त झालेला आहे. तसेच मस्साजोग ता. केज येथे पवनचक्ककी प्रकल्पाच्या कार्यालयात खंडणी मागणीसाठी गेलेले गुंड हे तेथील सुरक्षा रक्षकांना मारहाण करीत असल्याने सरपंच संतोष देशमुख हे त्यांच्या बचावासाठी तेथे गेले होते. त्याचा राग मनात धरून गुंडांनी संतोष देशमुख यांना टोल नाक्यावर अडवून त्यांचे अपहरण केले आणि अत्यंत निर्घृनपणे व मानवतेला लागेल अशा पद्धतीने त्यांची हत्या केली. या दोन्ही घटनेचा निषेध दि. १७ डिसेंबर रोजी रिपाइं (ए)चे नेते सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले आणि युवा रिपाईंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राहुल सरवदे, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, जिल्हा सल्लागार उत्तम मस्के, युवा रिपाइंचे निलेश ढोबळे, रमेश निशिगंध, जेष्ठ नेते दिलीप बनसोडे, नाना गायकवाड, सूरज काळे, विनोद गायकवाड, रोहित बचुटे, रंजित कांबळे, दादासाहेब धेंडे, हरेंद्र तुपारे, राजेंद्र धीरे, मसु बचुटे, मिलिंद भालेराव, विनोद शिंदे सरचिटणीस गौतम बचुटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. अशा घोषणा देत त्यांना शासकीय मदत मिळावी. तसेच गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे.
तसेच या प्रकरणातील दोषी असलेले पोलीस अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे. दलीत वस्त्या मधील कोंबिंग ओपरेशन्स थांबविण्यात यावे. अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार राकेश गिड्डे यांना दिले.