आनेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेचा नावीन्यपूर्ण उपक्रम

केज:- दत्तात्रय मुजमुले
तालुक्यातील आनेगाव येथील जि.प शाळेतील मुलींनी यावर्षी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने प्राणवायु देणाऱ्या झाडांना राख्या बांधुन अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला असुन याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असुन याची आज खऱ्या अर्थाने समाजाला आणि पर्यावरणाला गरज आहे.
आज रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आनेगाव जि.प.शाळेच्या आवारातील प्राणवायु देणाऱ्या झाडांना राख्या बांधुन खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाचा सण साजरा केला.सध्या पावसाने दडी मारल्याने सर्वत्र दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे.अशा वेळेस आपणास प्राणवायु देणाऱ्या झाडांना पाणी घालुन वाचवले पाहिजे हे लक्षात घेऊन मुलींनी झाडाला राख्या बांधल्या त्यांच्या विषयी आपली कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करून त्यांना मित्र बनवले तसेच यावेळी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड सप्रेम भेट म्हणुन देण्यात आले व ते झाड प्रत्येकाने आपल्या घरासमोर मोकळ्या जागेत अथवा शेतातील बांधावर लावुन ते जोपासण्याची शपथ देण्यात आली.
या आगळ्यावेगळ्या रक्षाबंधनाची संकल्पना सत्यात उतरवण्याचे काम सहशिक्षक श्री.पौळ सर व जयराम मांगडे सर यांनी केले असुन त्यांच्या कौतुकास्पद कार्याचे सर्वजण अभिनंदन करत आहेत.